वृत्तपत्राचे जनक कोण आहे?www.marathihelp.com

बाळशास्त्री जांभेकर : मराठी पत्रकारितेचे जनक

दर्पण या वृत्तपत्राद्वारे मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे, इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीच्या काळातील एक उच्च विद्याविभूषित, पंडिती व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळशास्त्री जांभेकर होत. 19 व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मराठी समाजमन घडविण्यात बाळशास्त्री जांभेकरांचा मोठा वाटा होता. कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले या गावी जन्मलेल्या बाळशास्त्रींनी अनेक विषयांचे अभ्यासक-संशोधक, अध्यापक, उत्कृष्ट लेखक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार म्हणून आपल्या कार्याचा ठसा 1832 ते 1846 या काळात उमटवला.

ब्रिटिशांनी भारतात येताच कोलकत्त्यामध्ये 'बेंगाल गॅझेट' नावाने इंग्रजी साप्ताहिक 29 जानेवारी 1780 रोजी सुरु केले. ब्रिटिश सरकारने आपल्या स्वार्थासाठी ठिकठिकाणी मुद्रणालये सुरु केली. समाज प्रबोधन करण्यासाठी हे महत्त्वाचे साधन आहे. त्याकरिता समाजाचे विचार परिवर्तन न होणारे वृत्तपत्र निघू नये, अशी त्यांची धारणा होती. परंतु कालांतराने आपले विचार प्रकट करण्यासाठी वृत्तपत्र हे प्रभावी माध्यम असल्याची भारतीयांना जाणीव झाली. यानंतर अनेक भारतीय भाषांतील वृत्तपत्र निघू लागली. बंगालीनंतर मराठी असा भाषिक वृत्तपत्रांचा क्रम लागतो.

ब्रिटिशांनी भारतात आपले बस्तान सार्वजनिक केल्यानंतर पाश्चिमात्य संस्कृती मूल्यांचा भारतातील पारंपरिक जुन्या मूल्यांशी संघर्ष निर्माण झाला. तथापि, पाश्चात्य संस्कृतीच्या परिचयामुळे भारतीय पंडितांना समाजातल्या घडामोडींची भौतिक दृष्टीने कारणमीमांसा करण्यास प्रोत्साहनही मिळाले. समाजातील वर्ण व्यवस्था, जातीभेद, स्त्री दास्य, सती प्रथा, अस्पृश्यता, बालविवाह आदी जुन्या मूल्यांचा पुनर्विचार करण्यास पंडितांना भाग पाडले. यातूनच एकसंध समाज निर्माण करण्यासाठी समाजातील भेदाभेद गेले पाहिजेत, याची त्यांना जाणीव झाली. हळूहळू समाज प्रबोधनाची प्रक्रिया सुरु झाली. यातच वृत्तपत्रांचे आगमन ही घटना क्रांतीकारक ठरली.

दर्पणचा पहिला अंक 6 जानेवारी 1832 रोजी प्रकाशित झाला. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र! या अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत असे. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर हा वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी होता. वृत्तपत्राची संकल्पना त्याकाळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पण अशा रितीने साडेआठ वर्षे चालले आणि जुलै 1840 ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.

आचार्य जांभेकर हे महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील समाजसुधारक होते. दर्पण हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोक शिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला. यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाचा प्रश्न व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार. बाळशास्त्रींनी या विषयांवर विपुल लेखन केले. त्यामुळे त्यावर विचारमंथन होऊन त्याचे रूपांतर विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत झाले.

ब्रिटीश सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या कलकत्ता, मद्रास (चेन्नई), मुंबई येथे इंग्रजी वृत्तपत्रांची सुरुवात झाली. परंतु जनतेच्या अस्तित्वाला या वृत्तपत्रात विशेष स्थान देण्यात येत नसे. या वृत्तपत्रांवर सरकारचे विशेष लक्ष होते. जहाजांची ये-जा, जाणाऱ्या-येणाऱ्या प्रमुख व्यक्तींची नावे, सरकारी जाहिराती आदी मजकूर वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्यात येत असे. यामुळे भारतीय सुशिक्षित वर्गात वृत्तपत्र ही कल्पना रुजू लागली. इंग्रजी भाषेत वृत्तपत्रे निघतात तर भारतीय भाषांतही अशी वृत्तपत्रे का निघू नयेत, असा प्रश्न निर्माण झाला.

कोलकत्त्ता येथे पहिले इंग्रजी वृत्तपत्र निघाल्यामुळे या शहरात पहिल्या भाषिक वृत्तपत्राचाही प्रारंभ झाला. भारतीय समाजाने नवीन वैचारिक जागृती आणि नवी जाणीव निर्माण होण्यास या वृत्तपत्रामुळे मदत झाली.
जेम्स ऑगस्टस हिकीच्या इंग्रजी 'बेंगॉल गॅझेट'च्या आगमनानंतर तब्बल अर्ध्या दशकाने म्हणजेच 52 वर्षांनी 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर या विद्वानानं 'दर्पण' च्या रुपाने पहिले मराठी वृत्तपत्र सुरु केले. मुंबईत जांभेकरांनी 'दर्पण'च्या माध्यमातून सुरु केलेली वैचारिक प्रबोधनाची पेरणी मराठी भूमीत रुजण्यास सुरुवात झाली.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 12:32 ( 1 year ago) 5 Answer 5662 +22